मासिक पाळी म्हणजे काय..?
मुलगी वयात आल्यावर म्हणजे साधारण 11 ते 14व्या वर्षी योनीमार्गातून दर महिन्यास दोन ते पाच दिवस जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी येणे असे म्हणतात.
दोन ते पाच दिवस रक्तस्राव झाल्यावर त्या महिन्यातील पाळी थांबते. त्यानंतर मासिक पाळी पुन्हा 25 ते 28 दिवसांनी येते. अशाप्रकारे मासिक चक्र स्त्रियांमध्ये सुरू असते. त्यानंतर साधारण वयाच्या 40 ते 55 च्या दरम्यान कधीही हळुहळू पाळी येणं बंद होते त्याला मेनोपॉज (रजोनिवृत्ती) असे म्हणतात.
मासिक पाळी येणे पुर्णतः नैसर्गिक क्रिया असून मानवी वंशावळ वाढविण्यासाठी, प्रजननासाठी अत्यंत आवश्यक असते. मासिकपाळी सुरु झाली म्हणजे मुलीची माता बनण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सुरु झालेली असते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील ती एक महत्त्वाची घटना असते. प्रत्येक मुलीचे मासिक पाळी येण्याचे वय वेगवेगळे असू शकते पण जर 16व्या वर्षापर्यंत मासिक पाळी आली नाही तर तात्काळ स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे असते.
मुलगी वयात आली की दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरुषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित हे आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्त्राव होतो. त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात. मासिक पाळी आल्यावर 2 ते 5 दिवस रक्तस्राव होऊ शकतो.
मासिकपाळी होताना काही त्रास होतो का..?
मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा आल्यावर काही स्त्रियांना थोडपार त्रास जाणवू शकतो. यामध्ये डोके दुखणे, कंबर दुखणे, पोटात दुखणे, झोप न लागणे, अंगदुखी यासारखा त्रास होऊ जाणवू शकतो.
पुन्हा मासिक पाळी किती दिवसांनी येते..?
कोणाला 24 दिवसांनी तर काहींना 29 दिवसांनीही येईल. एकद-दुसरा दिवस मागे पुढे होऊ शकतो यामध्ये नियमितता असत नाही. साधारणपणे मासिक पाळी पुन्हा 25 ते 28 दिवसांनी येते.
कोणती काळजी घ्यावी..?
• मासिकपाळी चालू असताना पूर्ण विश्रांतीची अजिबात गरज नाही. मात्र अतिकष्टाची कामे करू नयेत. घरातील नेहमीची कामे करावीत. ज्यांना पोटदुखी किंवा कंबरदुखी याचा अधिक त्रास असेल किंवा अंगावरून जास्त जात असेल तर मात्र विश्रांती घ्यावी.
• मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज असते. पाळीच्या काळात रोज सकाळी गरम पाण्याने आंघोळ करावी.
• या दिवसात या मासिक रक्तस्राव शोषण्यासाठी योनीमार्गाशी कापडाची घडी किंवा सॅनिटरी नॅपकिन ठेवावा लागतो.
• बाजारात मिळणारे सॅनिटरी नॅपकिन हे चांगले असले तरी अनेकांना परवडणारे नसतात. अशावेळी या काळात सुती कापडाच्या घड्याही आपण वापरु शकता. वापरावयाचे कापड हे स्वच्छ धुवून, कोरडे केलेलेच असावे.
• मासिक पाळीसंबंधी जुनाट विचारांना बळी पडू नका.
मासिक पाळी पुढे ढकलता येते का..? आणि असे करणे योग्य आहे का..?
आज तरुणींमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मासिकपाळी पुढे ढकलणार्या गोळ्या घेण्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे. त्या गोळ्यांचा गंभीर परिणाम आरोग्यावर होत असतो. एखादवेळेस अशा प्रकारच्या गोळ्या घेणे ठीक आहे. मात्र त्याची सवय लावू नका. यामुळे मासिकपाळीचे नैसर्गिक चक्र बिघडते. ह्या ना त्या कारणांसाठी मासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी वरचेवर गोळ्या घेणे योग्य नाही. असे करण्याने भविष्यात अनेक गंभीर समस्या उदभवू शकतात. कारण या गोळ्यांचे स्त्रियांवर दुष्परिणाम होऊ शकतात.
मासिक पाळीच्या वेळी संबंध ठेवणे योग्य की अयोग्य..?
दोघांचीही मानसिक तयारी असल्यास मासिक पाळीच्या काळात संभोग करण्यास काही हरकत नाही. पण स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास ही विचारात घेणे गरजेचे असते.
संकलन : सुशिल म.कुवर

No comments:
Post a Comment